*खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांची आवडती नायिका परत येतेय*
*कोण होतीस तू, काय झालीस तू!मालिकेतून गिरीजा प्रभू नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला*
स्टार प्रवाहची सुपरहिट मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोण होतीस तू, काय झालीस तू! या नव्याकोऱ्या मालिकेतून गिरीजा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.
कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरीजा प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, ‘स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे. पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे कोकणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी कोकणी भाषेचे धडे गिरवत आहे. कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल. गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तू, काय झालीस तू! लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.’