*गावातील सत्तासंघर्ष आणि महिला सशक्तीकरणाचा प्रवास – ‘सौभाग्यवती सरपंच’ आता या ओटीटीवर फक्त तुमच्यासाठी...*
*मुंबई, 23 जानेवारी 2025 :* ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे. गावातील महिला जेव्हा समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतात, तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. परंतु या महिलांनी दाखवून दिले की जिथे महिलांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, तिथे समाजाची खरी प्रगती होते त्यांच्या संघर्षांचा आणि यशाचा प्रवास दाखवणारी ही कथा महिला आरक्षित सरपंच पदाच्या निवडणुकीतून उलगडते.
दादाराव, गावाचा दोन टर्म सरपंच, ज्याचे जीवन केवळ राजकारणापुरते मर्यादित असते. दुसरीकडे, अवली ही एक सामान्य गृहिणी आहे, जी बारावीपर्यंत शिक्षण घेतलेली असून तिचे जीवन नवरा, मुलगा आणि सासू यांच्या भोवती फिरत असते. मात्र, जेव्हा महिलांच्या हातात सत्ता येते, तेव्हा त्या कर्तृत्वाची ताकद दाखवून देतात, हे अवलीच्या प्रवासातून दिसून येते. सरपंचपदावर निवड झाल्यानंतर, अवली गावातील समस्यांवर तोडगा काढते, महिलांसाठी नवी दालने उघडते आणि संपूर्ण गावाच्या विकासासाठी स्वतःला झोकून देते. परंतु या प्रवासात तिच्या समोर अनेक अडचणी येतात – कधी घरातील अपेक्षांचा ताण, तर कधी गावातील प्रश्नांवर उपाय शोधण्याची गरज. मात्र, तिच्या प्रत्येक निर्णयामध्ये गावाच्या भल्यासाठीची तळमळ आणि कुटुंबाच्या आनंदासाठीचा त्याग दिसतो, जो प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडतो. घराची, जवळच्या नात्यांची व सरपंपदाची जबाबदारी पार पडत असताना अडचणी उभ्या राहतात आणि त्या अडचणींवर ती कसे तोडगे काढते, हे केवळ महिलांनीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राने बघण्यासारखे आहे.
२२ जानेवारीला झालेल्या पत्रकार परिषदेत ‘सौभाग्यवती सरपंच’ सिरीजमधील सर्व मुख्य कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी सिरीजचे कलाकार देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले, अश्विनी कुलकर्णी आणि पद्मनाभ भिंड उपस्थित होते. सिरीजचे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी या वेब सिरीजच्या प्रेरणादायी कथेबद्दल माहिती दिली, तर अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी सिरीजच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला.